Sunday, 12 August 2018

दिलीप चित्रे गेले तेव्हा


                                   दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला दुःखद फीलिंगही होते . 


                                       आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे  तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता  संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता. मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा एकत्र आग्रह धरा किंवा देशीवादावर टीका करून मराठी ही जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे हे स्वीकारा चित्रे हे ह्यातील काहीही करत नव्हते, त्यांना मराठी संस्कृतीचे इंग्रजी प्रवर्तक व्हायचे होते आणि इंग्रजी संस्कृतीचे मराठी प्रवर्तक 
( ब्रिटिश नव्हे ) भारतीय माणसाच्या दुभंगलेपणाचे ते टिपिकल उदाहरण होते इंग्रजीतून ते भारतीय संस्कृतीच्या  मार्गी धारेला समृद्ध करत होते  तर मराठीतून ते मराठीपणा , मराठीच्या मराठी ओळखी ( marathi identity ) चा शोध घेत होते

                                       १८०० ते १९४७ ह्या कालखंडात युरोपियन लोकांनी भारतीय संस्कृती अनेक जागी पंक्चर केली आणि १८०० ते १९४७ साली सारे भारतीय विचारवंत भारताचे स्वातंत्र्य , भारताची भारत म्हणून ओळख भारत नावाच्या राष्ट्राची शक्यता ह्या राष्ट्राच्या नवनिर्माणाचा आराखडा ह्यासारख्या अनेक विचारप्रणालीनिष्ठ संदर्भात झोकून देऊन काम करू लागले . परलोकावरची भारतीय नजर हटवून इहलोकनिष्ठ विचारप्रणालीचा पाया ह्या काळातच घातला गेला ह्या काळातील भारतीय अध्यात्मही परलोकाला प्राधान्य देणारे नव्हते ह्या सगळ्या गोष्टींचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते. त्यातून साहित्यात धर्माच्या दादागिरीला विरोध करून नव्या अध्यात्माचा पुरस्कार करणारा नवा  अध्यात्मवाद , विज्ञानाला प्रमाण मानणारा सौदर्यवाद , नुसत्या वास्तवाची मांडणी करून काय होणार हे वास्तव बदलले पाहिजे आणि भाषिक कृतीने ह्या बदलाच्या प्रकियेला हातभार लावला पाहिजे असं मानणारा परिवर्तनवाद असे चार प्रवाह उदयाला आले दिलीप चित्रे ह्यांची जडणघडण ह्या चार प्रवाहात झाली मात्र ह्या चारही प्रवाहांशी त्यांचे तितकेसे कलावंत म्हणून पटले नाही सृष्टीयतेचा बुद्धीवाद हा हळूहळू यांत्रिकी होत गेला आणि १८५० नंतर जे नवे विज्ञान व तंत्रज्ञान जन्माला आले त्याने  ह्या पारंपरिक विज्ञानाला आव्हान द्यायला सुरुवात केली हळूहळू विज्ञानाचे महत्व कमी होऊन तंत्रज्ञानाची वाढ व्हायला लागली प्रतिसृष्टीचा प्रचंड पसारा सर्वत्र अवतरायला लागला आणि  क्रयवस्तूंचे प्रचंड ढिगारे मानवी अस्तित्वावर आदळायला लागले क्रयवस्तूचे  नवे संरचन शोधणारे संशोधक नव्या नव्या क्रयवस्तू शोधायला लागले आणि ह्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेऊन नव्या नव्या कलावस्तू जन्माला घालणारे कलावंतही कळत नकळत वाढू लागले कला ही प्रथमच इंडस्ट्री बनली तर कलावस्तू ही प्रॉडक्ट बनली कमोडिटी बनली पहिली कमोडिटीचे संशोधक हे स्वतःचे आयुष्य पणाला लावून निर्मिती करत होते त्यांची पॅशन अजोड होती त्यातील एडिसनसारखे संशोधक तर फिनॉमिना होते साहित्यात ह्याच जातकुळीचे काही लेखक व चित्रकार झाले
चित्रे हे ह्या जातकुळीतील देशी अस्तित्ववादी लेखक होते जरी त्यांची सुरवात युरोपियन अस्तित्ववादापासून झाली होती मात्र कोसलानंतर नेमाडेंनी जशी आधुनिकतेकडे पाठ फिरवली तशी त्यांनी पाठ फिरवली नाही ते आणि अरुण कोलटकर ह्यांनी नेमाडे ह्यांचा कट्टर देशीवाद आणि सत्यकथेचा आधुनिकवाद ह्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतःच्या अस्तित्ववादी आशयाने आणि अतिवास्तववादी अभिव्यक्तीने व्यवस्थित पेलला एका अर्थाने हा मराठी आधुनिकतेचा शोध होता आणि चित्रे मी हा शोध करावा म्हणून माझ्याकडे सातत्याने आग्रह धरून होते माझे म्हणणे असे होते कि हे मिशन देशीवाद्यांचे आहे आणि त्यांनीच ते पूर्ण केले पाहिजे माझा आग्रह चौथ्या नवतेचा आहे आणि तो आजन्म राहणार ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि साहित्य हे काही गणिती  हिशेबाने बदलत नाही
ह्यावर माझे म्हणणे असे होते कि साहित्यातला प्रत्येक हिशेब हा नवतेने सुरु होतो मग हा हिशेब गणिती असो वा नसो . माझा दुसरा प्रश्न  असा होता  कि देशी आधुनिकतेचा शोध शब्दवेधची मंडळी घेतायत सौष्ठव  वा अभिधा ह्यांनी  हे काम का करावे  पुढे अभिधाने आपली भूमिका बदलली आणि शब्दवेध प्रमाणेच सर्वसमावेशक म्हणजेच सर्वांनाच सामावून घेण्याची भूमिका घेतली जी चित्र्यांच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत होती आणि पुढे सौष्ठवची क्रांतिकारी भूमिका ही मागे पडत गेली आणि काळाने आणि मराठी संस्कृतीने लोकप्रियतेची आणि मान्यतेची मोहर ही शब्दवेध आणि अभिधानानंतर ह्यांच्यावर उमटवून चित्रे हे माझ्यापेक्षा द्रष्टे होते व मी हटवादी आणि  हेकेखोर असल्याचे सिद्ध केले चित्रे ज्या निष्ठेने अभिधानंतरच्या मागे उभे राहिले ते नक्कीच काबिलेतारीफ होते पुढे दोनहजारोत्तर पिढी शब्धवेध , खेळ आणि  अभिधानंतरच्या वळचणीला जाऊन उभी राहिली आणि मी च्यू असल्याचे सिद्ध झाले  हा चित्र्यांचा मोठाच विजय होता अर्थात तरीही मी माझा आग्रह सोडला न्हवता आणि नाहीये . माणसाने संपूर्ण जग वा संस्कृती जरी त्याच्या विरोधात गेले तरी स्वतःला पटलेली भूमिका सोडता कामा नये असे मला वाटते अशावेळी  एकट्याने स्वतःची पायवाट तुडवत जावे लागणे अटळ असते मी ती आजही तुडवतो आहेच

                   चित्र्यांचे साहित्य समजून कसे घ्यायचे हा एक विलक्षण कूटप्रश्न आहे मी टिकाहरण लिहिले तेव्हा दूधपिता बच्चा असलो तरी मी चित्र्यांच्याविषयी त्यात जे लिहिले होते ते चित्र्यांना चांगलेच झोंबले होते त्यांनी टीकाहरण वाचून चक्क रात्री फोन केला होता आणि माझी खरडपट्टी काढली होती वास्तविक त्यात काही चांगली निरीक्षणेही होती म्हणजे चित्रे हे मराठीतील बाईच्या शरीरात नाक खुपसणारे पहिले कवी आहेत वैग्रे पण मी केलेली टीकाच त्यांना जास्त झोंबली होती मी काही बदल करून मगच टीकाहरण प्रकाशित करावे असा त्यांचा सल्ला होता जो मी धुडकावला पुढे आणखी एका कवीने तेच सांगितले एकंदरच त्यामुळे वातावरण गढूळ होत गेले आणि पुस्तक पॉप्युलरकडून सतीश पाध्येंच्या शब्दवेल प्रकाशनाकडे द्यायची वेळ आली . अर्थात तरीही माझी चित्र्यांच्या कवितेविषयीची आस्था कमी झाली नाही . आणि चित्रेही "तू मराठी आधुनिकतेची नवी मांडणी करू शकतोस तू ती कर " हे सांगायचे थांबले नाहीत माझे स्वतःचे लक्ष्य कायमच चौथ्या नवतेकडे असल्याने चित्र्यांना होकार देणे मला शक्यच न्हवते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीकडे नीट पाहता येईल असे वाटते

                  मराठीच्या साहित्यशास्त्राची नवी ओळख निर्माण करायची असेल तर ज्ञानेश्वर , चक्रधर , नामदेव , एकनाथ ह्या चारही कवींच्या तंत्रशास्त्राची जडणघडण नीट तपासायला लागते ह्यातील ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे चित्र्यांचे फेव्हरेट होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे साहित्यशास्त्र हे ज्ञानेश्वरवादी होते ज्ञानेश्वर हे प्रज्ञा आणि भाव ह्यांचा समतोल साधत लिखाण करत कधी ज्ञानेश्वरीसारखे प्रज्ञालक्ष्यी तर कधी अभंगासारखे भावलक्ष्यी लिहीत ते प्रतीकांच्या भाषेत खूपदा बोलत आणि ही प्रतीके मोगरा , कावळा , चोळी अशी अत्यंत मराठी होती ज्ञानेश्वरी हे त्यांचे मोक्षापूर्वीचे लिखाण असल्याने त्यात परंपरेचे आदेश प्रमाण मानण्याची वृत्ती जास्त आहे तर अनुभवामृतमध्ये मोक्ष मिळाल्यानंतरचा शैववाद झळाळताना दिसतो अभंगात मात्र त्यांना विठाई ही स्थानिक देवता केंद्रीभूत करावीशी वाटली हे शैवीझमला धरूनच होते एका अर्थाने कृष्ण , शिव आणि विठ्ठल ही ट्रिनिटी त्यांनी वारकऱ्यांना दिली असे म्हणता येईल प्रत्यक्षात वारकऱ्यांनी शिव बाजूला काढून विठ्ठल कृष्णरुप  करून वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते पूर्णच हिंदू झाले ही हिंदू ओळख विठ्ठलामुळे एका अर्थाने मराठी ओळख बनत गेली

बा सि मर्ढेकरांनी ओवी हा फॉर्म इतका जबरदस्त रीतीने वापरला कि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरवादाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण झाले असे आपण म्हणू शकतो मात्र मर्ढेकरांचा ज्ञानेश्वरवाद अनुभवामृताकडे फारसा वळलाच नाही आणि त्यामुळे चित्र्यांना चांगलीच संधी प्राप्त झाली चित्रेंनी शक्तीवर खूप कविता लिहिल्या विंदा करंदीकरांनी अनुभवामृताचे केलेलं अर्वाचिनीकरण चित्र्यांच्या कवितेत चांगलेच फळले एका अर्थाने स्वतःच्या काव्यगुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा होती त्यांचे गद्य मात्र एका अर्थाने काश्मिरी शैवागमच्या परंपरेला गद्य रूप कसे द्यायचे ह्याचा वस्तुपाठ होता हे गद्य एका अर्थाने मराठीचे साहित्यिक शक्तीपीठ आहे दुर्देवाने त्याची ताकद भुक्कड मराठी समीक्षकांना ओळखता आली नाही हे शक्तीपीठ निर्माण करताना त्यांना जी अविष्कारवादी शैली सापडली तिचे मूळ फ़्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि जर्मन एक्सप्रेशनिस्ट ह्यांच्यात होते ज्याचा प्रभाव ओक्टोव्हिया पाझ वर पडला होता आणि पाझचा प्रभाव चित्र्यांच्यावर पडला .

नामदेव हा मराठीतील पहिला वास्तववादी वारकरी कवी होय भाव आणि वास्तव ह्याची त्याने घातलेली अप्रतिम सांगड नामदेववाद निर्माण करती झाली आणि ह्या नामदेववादाला तुकारामाच्या रूपाने महारूप सापडले कवीने त्याचे जगणे , त्या जगण्याची जीवनशैली , जगण्यासाठी तो करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायाची हत्यारे आणि त्या व्यवसायाची व्यवसायशैली स्वतःच्या कवितेत जशीच्या तशी उमटवावी ही नामदेवाची दीक्षा चित्र्यांना कळली तरी फारशी फळली नाही  ह्याचे कारण ते करत असलेले व्यवसाय तितकेशे ठाम न्हवते शिवाय चित्र्यांना वास्तववादाचे थोडेसे वावडे होते त्यामुळेच नामदेववादी असलेल्या संत तुकारामांचे ते कवी म्हणून अफाट कौतुक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या कवितेचा वास्तववादी पिंड त्यांनी आपल्या कवितेत जोपासला नाही ह्याबाबतीत ते अखेरपर्यंत ज्ञानेश्वरवादीच राहिले १९८० नंतर मात्र देशीवादी ग्रामीण कविंनी वास्तवनिष्ठ नामदेववाद आपल्या कवितेत अक्षरशः उत्सवासारखा साजरा केला

एकनाथवाद हा मराठीत कधीच आदराचा विषय न्हवता कारण एकनाथांची तंत्रता आणि प्रायोगिकता आत्मसात करून कविता लिहिणे हे अनेकांना कृत्रिम वाटते प्रत्यक्षात कविता पुढे जाते ती प्रायोगिकतेमुळे ! एकनाथवादाला जर तुकारामासारखा कोणी महारूप देणारा कवी लाभला असता तर कदाचित मराठींचे काव्यशास्त्र अधिक समृद्ध झाले असते मराठीला त्यामुळे एकनाथवादाची दीक्षा मिळायला विंदा करंदीकर उगवण्याची वाट बघायला लागली विंदांनी एकनाथवादाचे आधुनिकीकरण केले आणि प्रयोगधर्मी कविता लिहिली . एकनाथांची नावड असणाऱ्या लोकांनी  त्यामुळे एकनाथांची आणि नंतर करंदीकरांची टर उडवणे हे स्वाभाविक होते विशेषतः नेमाडे आणि कधीकधी चित्रेही ! पुढे  अरुण कोलटकरांनी एकनाथवाद किती अस्सल रूपात प्रयोगधर्मी होऊ शकतो ह्याचे अनेक अस्सल नमुने पेश केले हे एकनाथवादाचे केवळ पुनर्जीवन न्हवते तर नवा देह जन्माला घालणे होते आणि हा देह एकनाथांपेक्षा अधिक जिवंत आणि रसरशीत होता त्यामुळे नेमाड्यांनाही स्वतःचे करंदीकरांच्याविषयीचे मत काही प्रमाणात बदलून घ्यावे लागले विंदा करंदीकरांना आपला वारस अरुण कोलटकराच्या रूपात जिवंतपणीच सापडावा ह्याला काव्यभाग्यच म्हंटले पाहिजे

चक्रधरवाद स्वतःच्या मठात कैद झाल्याने अनेक शतके गायब झाला तरी नेमाडेंच्या रूपाने जेव्हा त्याला वारस सापडला तेव्हा तो सर्वाधिक झळाळला ह्याचे कारण त्याचे गद्यवैपुल्य ! चक्रधरवादाचे गद्यावरचे प्रेम मराठीत नेमाडेंच्या रूपाने फळले चित्र्यांच्या गद्यावर चक्रधरवादाचा काहीच फरक झाला नाही कारण मी गायब असलेला चक्रधरी वास्तववाद त्यांच्या मीधर्मीपणाला मानवणे शक्यच न्हवते

थोडक्यात काय चित्र्यांनी तुकारामाच्या नावाने कितीही गळा काढला तरी प्रत्यक्षात त्यांची कविता ही ज्ञानेश्वरवादीच राहिली आणि काही अपवादात्मक कवितांत त्यांनी एकनाथवादी प्रयोगधर्मीता प्रकट केली असली तरी कोलटकरांच्याप्रमाणे तो कधीच त्यांचा पिंड झाला नाही त्यांचे अभंगही ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांचा योग्य समतोल आहे 





 चित्रेंनी मराठी कवितेला काय दिले ?
१ मराठीच्या अध्यात्मिक परंपरा आधुनिकतेच्या संदर्भात कशा पेलायच्या हे त्यांनी शिकवले कोलटकरांचे अध्यात्म हे मला कधीही सखोल संवेदनशीलतेचे वाटलेले नाही फक्त त्यांचे रॅपर आकर्षक असल्याने ते ताबडतोब डोळ्यात भरते त्यातला ढोबळपणा सहजासहजी लक्ष्यात येत नाही चित्र्यांचे संवेदनांचे उत्सव आणि जल्लोष हे सर्व सूक्ष्म आंदोलनांना पेलत जातात कोलटकर बॉलीवूड संगीताप्रमाणे आहेत तर  चित्रे शास्त्रीय गायकाने एखादी बंदिश मांडत जावी तसे जातात कोलटकर फटाके फोडत जातात तर चित्रे दिवे लावत जातात चित्र्यांना प्रत्येक कोना आणि कोपरा उजळवून टाकायचा असतो कोलटकर फटाका फोडून क्षणभरासाठी अख्खी खोली उजळवून टाकतात आणि त्याचा परिणाम लगेच होतो







No comments:

Post a Comment