Sunday, 12 August 2018

दिलीप चित्रे गेले तेव्हा


                                   दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला दुःखद फीलिंगही होते . 


                                       आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे  तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता  संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता. मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा एकत्र आग्रह धरा किंवा देशीवादावर टीका करून मराठी ही जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे हे स्वीकारा चित्रे हे ह्यातील काहीही करत नव्हते, त्यांना मराठी संस्कृतीचे इंग्रजी प्रवर्तक व्हायचे होते आणि इंग्रजी संस्कृतीचे मराठी प्रवर्तक 
( ब्रिटिश नव्हे ) भारतीय माणसाच्या दुभंगलेपणाचे ते टिपिकल उदाहरण होते इंग्रजीतून ते भारतीय संस्कृतीच्या  मार्गी धारेला समृद्ध करत होते  तर मराठीतून ते मराठीपणा , मराठीच्या मराठी ओळखी ( marathi identity ) चा शोध घेत होते

                                       १८०० ते १९४७ ह्या कालखंडात युरोपियन लोकांनी भारतीय संस्कृती अनेक जागी पंक्चर केली आणि १८०० ते १९४७ साली सारे भारतीय विचारवंत भारताचे स्वातंत्र्य , भारताची भारत म्हणून ओळख भारत नावाच्या राष्ट्राची शक्यता ह्या राष्ट्राच्या नवनिर्माणाचा आराखडा ह्यासारख्या अनेक विचारप्रणालीनिष्ठ संदर्भात झोकून देऊन काम करू लागले . परलोकावरची भारतीय नजर हटवून इहलोकनिष्ठ विचारप्रणालीचा पाया ह्या काळातच घातला गेला ह्या काळातील भारतीय अध्यात्मही परलोकाला प्राधान्य देणारे नव्हते ह्या सगळ्या गोष्टींचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते. त्यातून साहित्यात धर्माच्या दादागिरीला विरोध करून नव्या अध्यात्माचा पुरस्कार करणारा नवा  अध्यात्मवाद , विज्ञानाला प्रमाण मानणारा सौदर्यवाद , नुसत्या वास्तवाची मांडणी करून काय होणार हे वास्तव बदलले पाहिजे आणि भाषिक कृतीने ह्या बदलाच्या प्रकियेला हातभार लावला पाहिजे असं मानणारा परिवर्तनवाद असे चार प्रवाह उदयाला आले दिलीप चित्रे ह्यांची जडणघडण ह्या चार प्रवाहात झाली मात्र ह्या चारही प्रवाहांशी त्यांचे तितकेसे कलावंत म्हणून पटले नाही सृष्टीयतेचा बुद्धीवाद हा हळूहळू यांत्रिकी होत गेला आणि १८५० नंतर जे नवे विज्ञान व तंत्रज्ञान जन्माला आले त्याने  ह्या पारंपरिक विज्ञानाला आव्हान द्यायला सुरुवात केली हळूहळू विज्ञानाचे महत्व कमी होऊन तंत्रज्ञानाची वाढ व्हायला लागली प्रतिसृष्टीचा प्रचंड पसारा सर्वत्र अवतरायला लागला आणि  क्रयवस्तूंचे प्रचंड ढिगारे मानवी अस्तित्वावर आदळायला लागले क्रयवस्तूचे  नवे संरचन शोधणारे संशोधक नव्या नव्या क्रयवस्तू शोधायला लागले आणि ह्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेऊन नव्या नव्या कलावस्तू जन्माला घालणारे कलावंतही कळत नकळत वाढू लागले कला ही प्रथमच इंडस्ट्री बनली तर कलावस्तू ही प्रॉडक्ट बनली कमोडिटी बनली पहिली कमोडिटीचे संशोधक हे स्वतःचे आयुष्य पणाला लावून निर्मिती करत होते त्यांची पॅशन अजोड होती त्यातील एडिसनसारखे संशोधक तर फिनॉमिना होते साहित्यात ह्याच जातकुळीचे काही लेखक व चित्रकार झाले
चित्रे हे ह्या जातकुळीतील देशी अस्तित्ववादी लेखक होते जरी त्यांची सुरवात युरोपियन अस्तित्ववादापासून झाली होती मात्र कोसलानंतर नेमाडेंनी जशी आधुनिकतेकडे पाठ फिरवली तशी त्यांनी पाठ फिरवली नाही ते आणि अरुण कोलटकर ह्यांनी नेमाडे ह्यांचा कट्टर देशीवाद आणि सत्यकथेचा आधुनिकवाद ह्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतःच्या अस्तित्ववादी आशयाने आणि अतिवास्तववादी अभिव्यक्तीने व्यवस्थित पेलला एका अर्थाने हा मराठी आधुनिकतेचा शोध होता आणि चित्रे मी हा शोध करावा म्हणून माझ्याकडे सातत्याने आग्रह धरून होते माझे म्हणणे असे होते कि हे मिशन देशीवाद्यांचे आहे आणि त्यांनीच ते पूर्ण केले पाहिजे माझा आग्रह चौथ्या नवतेचा आहे आणि तो आजन्म राहणार ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि साहित्य हे काही गणिती  हिशेबाने बदलत नाही
ह्यावर माझे म्हणणे असे होते कि साहित्यातला प्रत्येक हिशेब हा नवतेने सुरु होतो मग हा हिशेब गणिती असो वा नसो . माझा दुसरा प्रश्न  असा होता  कि देशी आधुनिकतेचा शोध शब्दवेधची मंडळी घेतायत सौष्ठव  वा अभिधा ह्यांनी  हे काम का करावे  पुढे अभिधाने आपली भूमिका बदलली आणि शब्दवेध प्रमाणेच सर्वसमावेशक म्हणजेच सर्वांनाच सामावून घेण्याची भूमिका घेतली जी चित्र्यांच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत होती आणि पुढे सौष्ठवची क्रांतिकारी भूमिका ही मागे पडत गेली आणि काळाने आणि मराठी संस्कृतीने लोकप्रियतेची आणि मान्यतेची मोहर ही शब्दवेध आणि अभिधानानंतर ह्यांच्यावर उमटवून चित्रे हे माझ्यापेक्षा द्रष्टे होते व मी हटवादी आणि  हेकेखोर असल्याचे सिद्ध केले चित्रे ज्या निष्ठेने अभिधानंतरच्या मागे उभे राहिले ते नक्कीच काबिलेतारीफ होते पुढे दोनहजारोत्तर पिढी शब्धवेध , खेळ आणि  अभिधानंतरच्या वळचणीला जाऊन उभी राहिली आणि मी च्यू असल्याचे सिद्ध झाले  हा चित्र्यांचा मोठाच विजय होता अर्थात तरीही मी माझा आग्रह सोडला न्हवता आणि नाहीये . माणसाने संपूर्ण जग वा संस्कृती जरी त्याच्या विरोधात गेले तरी स्वतःला पटलेली भूमिका सोडता कामा नये असे मला वाटते अशावेळी  एकट्याने स्वतःची पायवाट तुडवत जावे लागणे अटळ असते मी ती आजही तुडवतो आहेच

                   चित्र्यांचे साहित्य समजून कसे घ्यायचे हा एक विलक्षण कूटप्रश्न आहे मी टिकाहरण लिहिले तेव्हा दूधपिता बच्चा असलो तरी मी चित्र्यांच्याविषयी त्यात जे लिहिले होते ते चित्र्यांना चांगलेच झोंबले होते त्यांनी टीकाहरण वाचून चक्क रात्री फोन केला होता आणि माझी खरडपट्टी काढली होती वास्तविक त्यात काही चांगली निरीक्षणेही होती म्हणजे चित्रे हे मराठीतील बाईच्या शरीरात नाक खुपसणारे पहिले कवी आहेत वैग्रे पण मी केलेली टीकाच त्यांना जास्त झोंबली होती मी काही बदल करून मगच टीकाहरण प्रकाशित करावे असा त्यांचा सल्ला होता जो मी धुडकावला पुढे आणखी एका कवीने तेच सांगितले एकंदरच त्यामुळे वातावरण गढूळ होत गेले आणि पुस्तक पॉप्युलरकडून सतीश पाध्येंच्या शब्दवेल प्रकाशनाकडे द्यायची वेळ आली . अर्थात तरीही माझी चित्र्यांच्या कवितेविषयीची आस्था कमी झाली नाही . आणि चित्रेही "तू मराठी आधुनिकतेची नवी मांडणी करू शकतोस तू ती कर " हे सांगायचे थांबले नाहीत माझे स्वतःचे लक्ष्य कायमच चौथ्या नवतेकडे असल्याने चित्र्यांना होकार देणे मला शक्यच न्हवते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीकडे नीट पाहता येईल असे वाटते

                  मराठीच्या साहित्यशास्त्राची नवी ओळख निर्माण करायची असेल तर ज्ञानेश्वर , चक्रधर , नामदेव , एकनाथ ह्या चारही कवींच्या तंत्रशास्त्राची जडणघडण नीट तपासायला लागते ह्यातील ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे चित्र्यांचे फेव्हरेट होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे साहित्यशास्त्र हे ज्ञानेश्वरवादी होते ज्ञानेश्वर हे प्रज्ञा आणि भाव ह्यांचा समतोल साधत लिखाण करत कधी ज्ञानेश्वरीसारखे प्रज्ञालक्ष्यी तर कधी अभंगासारखे भावलक्ष्यी लिहीत ते प्रतीकांच्या भाषेत खूपदा बोलत आणि ही प्रतीके मोगरा , कावळा , चोळी अशी अत्यंत मराठी होती ज्ञानेश्वरी हे त्यांचे मोक्षापूर्वीचे लिखाण असल्याने त्यात परंपरेचे आदेश प्रमाण मानण्याची वृत्ती जास्त आहे तर अनुभवामृतमध्ये मोक्ष मिळाल्यानंतरचा शैववाद झळाळताना दिसतो अभंगात मात्र त्यांना विठाई ही स्थानिक देवता केंद्रीभूत करावीशी वाटली हे शैवीझमला धरूनच होते एका अर्थाने कृष्ण , शिव आणि विठ्ठल ही ट्रिनिटी त्यांनी वारकऱ्यांना दिली असे म्हणता येईल प्रत्यक्षात वारकऱ्यांनी शिव बाजूला काढून विठ्ठल कृष्णरुप  करून वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते पूर्णच हिंदू झाले ही हिंदू ओळख विठ्ठलामुळे एका अर्थाने मराठी ओळख बनत गेली

बा सि मर्ढेकरांनी ओवी हा फॉर्म इतका जबरदस्त रीतीने वापरला कि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरवादाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण झाले असे आपण म्हणू शकतो मात्र मर्ढेकरांचा ज्ञानेश्वरवाद अनुभवामृताकडे फारसा वळलाच नाही आणि त्यामुळे चित्र्यांना चांगलीच संधी प्राप्त झाली चित्रेंनी शक्तीवर खूप कविता लिहिल्या विंदा करंदीकरांनी अनुभवामृताचे केलेलं अर्वाचिनीकरण चित्र्यांच्या कवितेत चांगलेच फळले एका अर्थाने स्वतःच्या काव्यगुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा होती त्यांचे गद्य मात्र एका अर्थाने काश्मिरी शैवागमच्या परंपरेला गद्य रूप कसे द्यायचे ह्याचा वस्तुपाठ होता हे गद्य एका अर्थाने मराठीचे साहित्यिक शक्तीपीठ आहे दुर्देवाने त्याची ताकद भुक्कड मराठी समीक्षकांना ओळखता आली नाही हे शक्तीपीठ निर्माण करताना त्यांना जी अविष्कारवादी शैली सापडली तिचे मूळ फ़्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि जर्मन एक्सप्रेशनिस्ट ह्यांच्यात होते ज्याचा प्रभाव ओक्टोव्हिया पाझ वर पडला होता आणि पाझचा प्रभाव चित्र्यांच्यावर पडला .

नामदेव हा मराठीतील पहिला वास्तववादी वारकरी कवी होय भाव आणि वास्तव ह्याची त्याने घातलेली अप्रतिम सांगड नामदेववाद निर्माण करती झाली आणि ह्या नामदेववादाला तुकारामाच्या रूपाने महारूप सापडले कवीने त्याचे जगणे , त्या जगण्याची जीवनशैली , जगण्यासाठी तो करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायाची हत्यारे आणि त्या व्यवसायाची व्यवसायशैली स्वतःच्या कवितेत जशीच्या तशी उमटवावी ही नामदेवाची दीक्षा चित्र्यांना कळली तरी फारशी फळली नाही  ह्याचे कारण ते करत असलेले व्यवसाय तितकेशे ठाम न्हवते शिवाय चित्र्यांना वास्तववादाचे थोडेसे वावडे होते त्यामुळेच नामदेववादी असलेल्या संत तुकारामांचे ते कवी म्हणून अफाट कौतुक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या कवितेचा वास्तववादी पिंड त्यांनी आपल्या कवितेत जोपासला नाही ह्याबाबतीत ते अखेरपर्यंत ज्ञानेश्वरवादीच राहिले १९८० नंतर मात्र देशीवादी ग्रामीण कविंनी वास्तवनिष्ठ नामदेववाद आपल्या कवितेत अक्षरशः उत्सवासारखा साजरा केला

एकनाथवाद हा मराठीत कधीच आदराचा विषय न्हवता कारण एकनाथांची तंत्रता आणि प्रायोगिकता आत्मसात करून कविता लिहिणे हे अनेकांना कृत्रिम वाटते प्रत्यक्षात कविता पुढे जाते ती प्रायोगिकतेमुळे ! एकनाथवादाला जर तुकारामासारखा कोणी महारूप देणारा कवी लाभला असता तर कदाचित मराठींचे काव्यशास्त्र अधिक समृद्ध झाले असते मराठीला त्यामुळे एकनाथवादाची दीक्षा मिळायला विंदा करंदीकर उगवण्याची वाट बघायला लागली विंदांनी एकनाथवादाचे आधुनिकीकरण केले आणि प्रयोगधर्मी कविता लिहिली . एकनाथांची नावड असणाऱ्या लोकांनी  त्यामुळे एकनाथांची आणि नंतर करंदीकरांची टर उडवणे हे स्वाभाविक होते विशेषतः नेमाडे आणि कधीकधी चित्रेही ! पुढे  अरुण कोलटकरांनी एकनाथवाद किती अस्सल रूपात प्रयोगधर्मी होऊ शकतो ह्याचे अनेक अस्सल नमुने पेश केले हे एकनाथवादाचे केवळ पुनर्जीवन न्हवते तर नवा देह जन्माला घालणे होते आणि हा देह एकनाथांपेक्षा अधिक जिवंत आणि रसरशीत होता त्यामुळे नेमाड्यांनाही स्वतःचे करंदीकरांच्याविषयीचे मत काही प्रमाणात बदलून घ्यावे लागले विंदा करंदीकरांना आपला वारस अरुण कोलटकराच्या रूपात जिवंतपणीच सापडावा ह्याला काव्यभाग्यच म्हंटले पाहिजे

चक्रधरवाद स्वतःच्या मठात कैद झाल्याने अनेक शतके गायब झाला तरी नेमाडेंच्या रूपाने जेव्हा त्याला वारस सापडला तेव्हा तो सर्वाधिक झळाळला ह्याचे कारण त्याचे गद्यवैपुल्य ! चक्रधरवादाचे गद्यावरचे प्रेम मराठीत नेमाडेंच्या रूपाने फळले चित्र्यांच्या गद्यावर चक्रधरवादाचा काहीच फरक झाला नाही कारण मी गायब असलेला चक्रधरी वास्तववाद त्यांच्या मीधर्मीपणाला मानवणे शक्यच न्हवते

थोडक्यात काय चित्र्यांनी तुकारामाच्या नावाने कितीही गळा काढला तरी प्रत्यक्षात त्यांची कविता ही ज्ञानेश्वरवादीच राहिली आणि काही अपवादात्मक कवितांत त्यांनी एकनाथवादी प्रयोगधर्मीता प्रकट केली असली तरी कोलटकरांच्याप्रमाणे तो कधीच त्यांचा पिंड झाला नाही त्यांचे अभंगही ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांचा योग्य समतोल आहे 





 चित्रेंनी मराठी कवितेला काय दिले ?
१ मराठीच्या अध्यात्मिक परंपरा आधुनिकतेच्या संदर्भात कशा पेलायच्या हे त्यांनी शिकवले कोलटकरांचे अध्यात्म हे मला कधीही सखोल संवेदनशीलतेचे वाटलेले नाही फक्त त्यांचे रॅपर आकर्षक असल्याने ते ताबडतोब डोळ्यात भरते त्यातला ढोबळपणा सहजासहजी लक्ष्यात येत नाही चित्र्यांचे संवेदनांचे उत्सव आणि जल्लोष हे सर्व सूक्ष्म आंदोलनांना पेलत जातात कोलटकर बॉलीवूड संगीताप्रमाणे आहेत तर  चित्रे शास्त्रीय गायकाने एखादी बंदिश मांडत जावी तसे जातात कोलटकर फटाके फोडत जातात तर चित्रे दिवे लावत जातात चित्र्यांना प्रत्येक कोना आणि कोपरा उजळवून टाकायचा असतो कोलटकर फटाका फोडून क्षणभरासाठी अख्खी खोली उजळवून टाकतात आणि त्याचा परिणाम लगेच होतो







Friday, 10 August 2018

हेमंत दिवटे ह्यांनी घेतलेली श्रीधर तिळवे ह्यांची मुलाकात संवाद ६ दिवाळी २००६

                                                   १   ग्लोबलायझेशन  म्हणजे तुझ्या दृष्टीने नेमकं काय ? त्याचे चांगले / वाईट परिणाम कोणते ? ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया काही शतकांपासून सुरु आहे असं काहींना वाटत तर मला १९९० च्या आसपास ही प्रक्रिया सुरु होऊन तिचा प्रभावही जाणवू लागला, असं वाटतं ? तुला काय वाटत ?

                         मानवी संस्कृतीत १९०० नंतर शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी अनेक शोध लावून नव्या नव्या चिन्हवस्तू ( semiodities ) तयार केल्या ह्या चिन्हवस्तूंचे उत्पादन जसे जसे वाढत गेले तसा तसा त्यांचा भोग वा आस्वाद वाढायला लागला , ग्रहण वाढू लागले ह्यातून चिन्हसृष्टीकरण  सुरु झाले सुरुवातीचा कालखंड हा काहीसा innovations चा संशोधनाचा होता पण १९७५ नंतर त्याचे उत्पादन व वितरण प्रचंड प्रमाणात वाढले . नवीन आलेला हा चिन्हसृष्टीकरणाचा प्रवाह काही द्रष्ट्यांनी राजकारण्यांनी आधीच ओळखला . १९५५ नंतर अनेक विचारवंतांनी त्याचे निरूपण करायला सुरुवात केली ह्यातूनच सत्तरीच्या दशकात चिन , ब्रिटन वगैरे देशांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला हे उदारीकरण सरकारकेंद्री व सरकारवलंबी होते . ब्रिटनमध्ये त्याला थॅचरिझम असे नाव मिळाले भारतात  संशोधनाचा पहिला टप्पा घडलाच नाही पण चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा १९८० नंतर सुरु झाला सिमेंटच्या उदारीकरणाच्या मारुती उद्योगाने टेलिकम्युनिकेशन क्रांतीने त्याची सुरुवात झाली १९८० ते ११९८७ हा तो पहिला टप्पा . ह्याला भारतातील विचारविनिमयाचा टप्पा म्हणता येईल . चिन्हसृष्टीकरण करायचे कि नाही ? उदारीकरण कसे करावे कि करूच नये ? सोवियत युनियनचा पाडाव होऊ झाल्यामुळे समाजवादाचे भवितव्य काय हे ह्या काळातले उग्र प्रश्न ! ह्याच काळात पंजाबमधला दहशतवादाचा प्रश्न अत्यंत व्यापक झाला आणि तो पंजाबी देशीयतेत उदयाला आला त्याला आसामी देशीयतेची साथ मिळाली महाराष्ट्रातही शिवसेना पसरायला सुरुवात झाली देशी चिन्हांचा अस्मिता म्हणून वापर हाही ह्याच काळाचा विशेष मार्गी गोष्टी का, कशी, कुठे , किती, कोणासाठी, आणायच्या हा ह्या काळातला कळीचा प्रश्न होता व प्रयोगही चालू  झाले होते .


                                                   चिन्हसृष्टीचा दूसरा टप्पा १९८८ पासून सुरु झाला खाजगीकरण हा ह्या काळातील मुख्य मुद्दा ह्या खाजगीकरणामुळे व आधीच्या उदारीकरणामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला शिरकाव मिळाला ह्याला मी चिन्हसृष्टीकरणाचा दुसरा टप्पा मानतो मंडल आयोग , इस्लामी दहशतवाद , राजजन्मभूमीचा प्रश्न हे देशीयतेतून निर्माण झालेले प्रवाह एकीकडे तर खाजगीकरण व उदारीकरणामुळे सुरु झालेले मार्गी प्रवाह दुसरीकडे १९८८ ते १९९५ - ९६ असा हा कालखंड होता . ह्याला आपण चिन्हसृष्टीकरण म्हणू. कारण ह्या काळात आपला प्रचंड भर आयातीवर होता . मार्गी गोष्टींचे देशीकरण घडवणे ह्या काळात चालू झाले

                           १९९६ पासून मात्र जागतिकीकरणाचा शिरकाव हा शिरकाव न राहता ती हळूहळू सार्वत्रिक वस्तुस्थिती बनायला लागली उदारीकरण ( liberalisation ) खाजगीकरण ( privatisation ) आणि जागतिकीकरण ( globalization ) ( LPG ) ही त्रयी सर्वच चर्चाच्या केंद्रस्थानी आली . जे देशी आहे ते टिकते कि नाही असा प्रश्न अनेकांना सतवायला लागला तर अनेक देशी कंपन्या बहुराष्ट्रीय होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या काही तर प्रचंड यशस्वी झाल्या ह्याला आपण मार्गी आणि देशी ह्यांच्या मिश्रणाचा कालखंड असल्याने मादे चिन्हसृष्टीकरण म्हणू . मादे चिन्हसृष्टीकरणाचा कालखंड अद्यापही चालू आहे . आता चिन्हसृष्टीकरणात आपण निर्यातही करायला लागलोय . आज अनेक देशी गोष्टी ग्लोबल होत जाताना दिसतायत . उदा. आपली साडी

                           जागतिकीकरण हे ह्या चिन्हसृष्टीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने प्रसरण ह्या प्रक्रियेचा समावेश होतो कुठल्याही देवघेवीत देणे आणि घेणे असते ही देवघेव एकतर प्रचंड सुकाळामुळे निर्माण होते किंवा टोकाच्या दुष्काळामुळे , म्हणजे तुमच्याकडे इतके उत्पादन होते कि ते तुम्हाला जगभर वाटण्यावाचून पर्याय उरत नाही. तुम्ही जी गोष्ट जगाला देऊ पाहता कधी प्रेमाने कधी मार्केटिंग करून तर कधी सक्तीने तर काही वेळा इतका दुष्काळ निर्माण होतो कि आसपासच्या परिसरातून तुम्हाला काहीच घेता येणे शक्य होत नाही अशा वेळी तुमची भूक प्रचंड तीव्र असेल तर तुम्ही घेण्यासाठी परिसर सोडून जगात  ती जिथे कुठे मिळते तिथे जाता किंवा ती आयात करता , कधी प्रेमाने मागता तर कधी दादागिरी करून तर कधी मेहनत करून कधी स्वतःचे मार्केटिंग करून ही जी देवघेव आहे ती जेव्हा जागतिक होते तेव्हा तिला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरणातला हा दुष्काळ वा  सुकाळ प्रत्येकवेळी नैसर्गिकच असेल असे नाही कधी कधी तो मानवी वा सामाजिकही असू शकतो अनेक स्थलांतरे ही दुष्काळातून होतात अनेकदा आयात करून  भूक भागवली जाते दुष्काळ मिटवला जातो तर निर्यात ही अनेकदा सुकाळातून निर्माण होते किंवा कशाच्या तरी बदल्यात ती केली जाते काही लोक इतके स्वभावतः अधाशी व भुकेले असतात कि त्यांना कुठेही दुष्काळच जाणवतो

                             अनेकदा राजकीय पक्षांना पैशांचा दुष्काळ जाणवल्याने त्यांनी तो दुष्काळ मिटवण्यासाठीही नको असलेली आयात केली आहे नको असलेले उदारीकरण वा खाजगीकरणही केले आहे अनेकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली अनावश्यक खाजगीकरणे आणि उदारीकरणेही केली गेली आहेत आणि कशालाही जागतिकीकरण म्हणून मान्यता देणाऱ्या अडाणी विचारवंतांनी जागतिकीकरण ह्या ब्रॅण्डला भुलून जाऊन ही अनावश्यक खाजगीकरणे व उदारीकरणेही आवाज न काढता स्वीकारली आहेत

                           उत्पादनाचा एकदा का दुष्काळ निर्माण झाला कि तो भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली जाते कारण दुष्काळाचा अर्थ उत्पादन कमी झाल्याने तोटा असा होतो अशा वेळी ग्राहक संख्या वाढणे व उत्पादन वाढणे हे कंपनी टिकण्यासाठी  आवश्यक असते त्यातूनच ती कंपनी खाजगी करावी ही मागणी येते किंवा ती खाजगी कंपनीला विकली जाते काही वेळा कंपन्या इतक्या कमी असतात कि नुसत्या खाजगीकरणाच्या काही होणार नसते मग त्या क्षेत्रात उदारीकरण आणून अनेक कंपन्या आणल्या जातात मग पुढे नुसत्या कंपन्या आणूनही भागत नाही त्यांची संख्या त्यांचे उत्पादन इतके कमी पडते कि बाहेरच्या कंपन्या , बाहेरचे भांडवल आणावे लागते आन मग त्यासाठी जागतिकीकरण अपरिहार्य असते पण जेव्हा देशी कंपन्यांना संधीही न देता थेट बाहेरच्या कंपन्यांना आणले जाते तेव्हा ते जागतिकीकरण विघातक जागतिकीकरण असते एनरॉन हे अशा विघातक जागतिकीकरणाचे उदहारण आहे जी संधी रिलायन्स व टाटांना आता दिलीय ती त्या वेळी दिली असती तर कदाचीत  विजेचा प्रश्न इतका चिघळला नसता पांढऱ्या कातडीला भुलून जाण्याची आपली सवय ही अनेकदा विघातक जागतिकीकरणाला आमंत्रण देते काही वेळा देशी कंपन्याच इतक्या बेजबाबदार आणि मुजोरड्या असतात कि त्यांना स्पर्धेचा फटका पडल्याशिवाय त्या सुधारत नाहीत अशा वेळी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून बाहेरच्या कंपन्या आणल्या जातात तेव्हा ते विधायक जागतिकीकरणच असते उदा , ऑटोमोबाईल इंडस्ट्री

                                जागतिकीकरण चांगले कि वाईट हे त्या त्या परिस्थितीच्या संदर्भ चौकटीत ठरत असते उदाहरणार्थ साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मितीसाठी दार्शनिकता व दर्शनता फार महत्वाची असते भारतात जिला चिन्हसृष्टीय दर्शनता म्हणावी अशी फारशी निर्माण झालेली नाही त्यामुळे संजीव खांडेकरांसारखा कवी जर फ्रेडरिक जेम्सन , कार्ल मार्क्स लाकान ह्यांच्यासारख्या पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या तत्वज्ञानातून काही आयात करून त्यांचा वापर स्वतःच्या कलानिर्मितीसाठी करत असेल तर आपण त्याला ते पूर्ण विघातक आहे असे म्हणून खोड काढू नये . पण त्याचबरोबर श्रीधर तिळवेसारखा एखादा गृहस्थ भारतीय दर्शनातील अनेक संकल्पनांची हवी तशी मोडतोड करून त्यातून भारतीय चिन्हसृष्टीय दर्शनता  निर्माण करत असेल तर तो केवळ भारतीय संज्ञा वापरतो म्हणून त्याला मागासलेला समजणे हेही शहरांढळेपणाचे
( गावंढळच्या विरोधी ) लक्षण होय . शक्यता अशीही असू शकते की ते पाश्च्यात्य दर्शन त्याला अत्यंत उथळ पोरकट आणि करिअरिस्ट वाटल्याने तो पुन्हा भारतीय दर्शनाकडे वळला असेल  

                              चिन्हसृष्टीकरण  ही  प्रतिसृष्टीकरण  व  त्यातून  आलेल्या औद्योगिकीकरणाइतकीच  अटळ  आणि  अपरिहार्य  गोष्ट  आहे  ते  खाजगीकरण ,  उदारीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातून  साकार  होते  आहे  हे  खरे  पण  प्रत्येक  वेळी  प्रत्येक  पैलू  अपरिहार्यच  असेल  असे  नाही  उदा.  सरकारने स्वतःला  खाजगी  कंपनी  समजून  सतत  प्रॉफिट  मेकिंगच्या  भूमिकेत  वावरणे  हे  विघातक  खाजगीकरणच  मानले पाहिजे  किंवा  खाजगी  उद्योग  हे  नेहमी  स्वर्गच  आणतील  ह्याही  भ्रमात  राहण्याचे  कारण  नाही .  ह्याबाबतीत  मार्गी ,  पोटी ,  देशी,  जमाती,  ह्याचे  समग्र  भान  राखून  सर्वांच्या  भल्याचे  काय  आहे   ते  पाहिले  पाहिजे .

                                          जागतिकीकरणाचा  एक  थेट  फायदा  म्हणजे  जगभरच्या   पर्यायांची उपलब्धता . पण  त्यामुळे  काही  चांगले  देशी  पर्याय  गहाळ  तर  होत  नाहीत  ना  हे  पण  पाहायला  हवे . मुक्तछंद , सुनीत,  मुक्त  सुनीत , चांगलीच ; पण  अभंग  ओवी  हे  देशी  म्हणून  वाईटच  ही  वृत्ती  वाईट  जगात  आपला  प्रदेशही  येतो  ह्याचेही  भान  आपण  बाळगावे .  जगाशी  चॅटिंग  करता  करता  स्वतःच्या  आईबापाशी  बायकोपोरांशी , शेजाऱ्यांशी  जर  धड  गप्पा  मारता  येत  नसतील  तर  त्याचा  अर्थ  जवळचे  वाचवण्यासाठी  आपल्याला  चष्मा  हवा  हाच  होतो  आणि  त्याचा  अधिक  मूलभूत  अर्थ  आपले  डोळे  खराब  झालेत  हाच  असतो .  १९९५  नंतर  जागतिकीकरण  हे  आपल्या  थेट (  विशेषतः  शहरात  )  घरात  घुसले  त्यामुळे  चिन्हसृष्टीकरणाचं  जागतिक  स्वरूप  आपल्या  तोंडावर  इतक्या  अवाढव्य प्रमाणात  आदळलं  कि  आपण  गडबडून  गेलो .

                                    विशेषतः  मध्यमवर्गाची  चौकोनी  कुटुंबाची  चौकोनी  कुटुंबमूल्ये  ही  नव्याने  आलेल्या  संपत्तीने   लालसेने,  उपभोगवादाने , बडेजाववादाने  पूर्ण  हादरली  आणि  त्यांनी  त्याच्या  प्रदर्शनाचा  उत्सवही मांडला  त्यामुळे  वाढदिवसाला  पंचारती  पुरेशी  होईना  ग्रीटिंग्ज  कार्डेही  लागू  लागली   संपत्ती  हे  पाप  न  होता  पुण्य  झाले  त्यामुळे  लोक  पुण्य  कमावण्याऐवजी  संपत्ती  कमावण्याच्या  मागे  लागले  ह्याकाळातील  मध्यमवर्गीय  मीडियाने  इतका  भरवला  गेला  कि  मीडिया  म्हणतो  तेच  खरे  असे  त्याला  वाटू  लागले  मग  मीडिया  म्हणाला  शीतयुद्ध  संपले  प्रत्यक्षात  शीतयुद्धात  अमेरिकेचा  शत्रू  बदलत होता  पण  चायना  ही  मीडियाच्या  दृष्टीने  क्षुल्लक  गोष्ट  असल्याने  त्याची  ताकदच  कळली  नव्हती  आज  सरळ  अमेरिका  विरुद्ध चायना  हे  युद्ध  आकार  घेत  आहे

                                      १९८०   नंतर  आलेल्या  सांस्कृतिक  उदारीकरणाने  आणि  १९८८  नंतर  आलेल्या  मंडल  आयोगाने  ब्राह्मण्यवादाला  चांगलेच  मोठे आव्हान  दिले  त्यातून  परिघाबाहेर  असलेल्या  अनेक  ओबीसी  जाती  प्रथमच  आपापली  ताकद  घेऊन  आल्या  त्यांनी  ह्या  देशातील  राजकारणाची  पारंपरिक सूत्रे  बदलून  टाकली  दुर्दैवाने  त्यातून  जातीयवादही  वाढला  बहुजनवाद  हा प्रथमच भारतीय   संस्कृतीत  एक   ताकदवान   पर्याय   म्हणून  अवतरला. भालचंद्र  नेमाडे  आनंद  यादव  नामदेव  ढसाळ   हे सरळ  बहुजनांचे  सांस्कृतिक  पुढारी  म्हणून  पुढे  आले  ब्राम्हण्याला  हे  सहन   होणे  शक्य  नव्हते

                                       ह्या  ब्राह्मण्याने  बहुजनांमधल्या  ब्राह्मण्य  स्वीकारायला  सोकावलेल्या  काही  बहुजनांना  हाताशी  धरून  वेगळेच  सांस्कृतिक  राजकरण  खेळायला  सुरुवात  केली  तर  बहुजनांतल्या  काही  अतिरेकी  लोकांनी  ब्राह्मण्य  म्हणजे  ब्राह्मण  अशी  उलटचक्री  जातीयवादी  भूमिका  घेऊन  प्रागतिक  ब्राह्मण्यांना  ते  केवळ  जन्माने  ब्राह्मण  आहेत  ह्या  एका  गुन्ह्यासाठी  झोडपायला  सुरुवात  केली  ह्यातून  ह्या  काळात वेगळेच  सांस्कृतिक  तणाव  निर्माण  झाले. १९८०  नंतर  जे  सांस्कृतिक  उदारीकरण  झाले  त्याचाच  हा भाग   होता  (  cultural   liberalisation  )  मंडल आयोग  ही  ह्या  सांस्कृतिक  उदारीकरणाची  केवळ  राजकीय  परिणती  होती .

                                        ह्या  बहुजनवादाने  जागतिकीकरणाचा  सामना  अत्यंत  अडाणीपणाने  केला  आणि  जागतिकीकरण   म्हणजे  काही  नवा  बटू  असून  आपण  बळी आहोत  अशी  मांडणी  करावयास  सुरुवात  केली  ही  चूक  होती  व   आहे  चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरण  ह्यांच्यातला  रशिया -अमेरिका -लॅटिन  अमेरिका -रशिया- यूरोप - पूर्व  आशिया  अशी  भटकली  तेव्हाच  सुमारे  ऐंशी  हजार  वर्षांपूर्वीच  झाली  चिन्हसृष्टीकरणातील  जागतिकीकरणाची  सुरुवात  भारतात  मात्र  १९८०  साली  झाली  मात्र  १९८२  ते  १९९२  ह्या  कालखंडात  जागतिकीकरण  हे  स्पीन  गोलंदाजी  टाकत  होते  कारण  भारतीय  खेळपट्टी  तशी  होती.  १९९२  पासून  मात्र  जागतिकीकरणाचा  फास्ट  बोलिंगचा  स्पेल  सुरु   झाला  विशेषतः  मनमोहनसिंगांनी  आपले  काम  ह्याच  वर्षी  सुरु  केले .  तिथूनच  जागतिकीकरण  उदारीकरण  व  खाजगीकरणावर  अधिक  खोल  चर्चा  सुरु  झाली  खरेतर  जागतिकीकरण  ह्या  विषयावर  मी  चारशे  पानाचं  एक  पुस्तक  लिहिलंय  त्यामुळे  त्याच्यावर  बोलेन  तितकं  कमीच  !

                                        थोडक्यात  काय ,  तर  जागतिकीकरण  म्हणजे  सर्व  महाराष्ट्रीय  व  राष्ट्रीय  सीमा  व  भिंती  कोसळून  सृजन  उत्पादन  वितरण , ग्रहण,  उत्सर्जन,  शिक्षण , संपादन,  जतन , संवेदन , बोधन, निरीक्षण, परीक्षण , निष्कर्षण, मुद्रण , संरक्षण, संघटन , वहन, वितरण, नियमन,  दळणवळण वगैरे  सर्व  क्रियांचे  त्यांच्याशी  जोडलेल्या   मितिकांचे  त्यांच्या  विशेषांचे  जागतिक  अवकाशात  झालेले  प्रसरण  होय .

                                        चौथी  नवता  जागतिकीकरणातील  जे  सर्व  मानवजातीसाठी  कल्याणकारी  आहे  ह्याचे  स्वागत  करते  उदाहरणार्थ  उद्या  जर  एड्सविरोधी   लस  समज  अमेरिकेने  शोधली  तर  ती  केवळ  अमेरिकन  आहे   म्हणून  तिला  विरोध  करायचा   हे  चौथ्या  नवतेला  मान्य  नाही  त्यामुळे  ती  जागतिकीकरणातील  विधायक  गोष्टींचे  स्वागत  करते  एनरॉनसारख्या  विघातक  गोष्टींना  विरोध  करते  गरज पडली  तर  त्यासाठी  प्रत्यक्ष  लढा  उभा  करते  आणि  हे  सर्व  करताना  त्या  क्रियांविषयी  ती  विलक्षण  जागृत  आणि  पूर्ण  अवधान  बाळगते  .

  २. तुझ्या  आजूबाजूच्या  समाजात  गेल्या  १०-१५  वर्षात  झालेले  ढोबळ  व  सूक्ष्म  बदल  कुठले  ?  

                                        चिन्हसृष्टीकरण  व  जागतिकीकरणामुळे  (  चीजा  हे संक्षिप्त  रूप  पुढे  वापरतो ) झालेले  परिणाम  हे  दुहेरी  आहेत

                                        एकतर  चिजामुळे  ज्याचा  प्रचंड  फायदा  झाला  असा  एक  प्रचंड  मोठा   सपाट  व  एकसाची  चेहऱ्याचा  मोठा  मध्यम  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  म्हणून  वर  आला  ह्या  वर्गाकडे  चिन्हसृष्टीने  निर्माण  केलेल्या  टेलेफोन , बाईक, कार, कम्प्युटर , क्रेडिट  वगैरे  कार्ड  उत्तम पैसे  व त्यातून  निर्माण  होणारी  खरेदीशक्ती  अशा  अनेक  चिन्हवस्तू  व  चिन्हशक्ती  आल्या  हा  वर्ग  चिन्हसृष्टीला  ऍक्सेसिबल  झाला  आणि  त्याचे  प्रमाण  ३० ते ४०  टक्के झाले  त्याची  कळत नकळत  एक सांस्कृतिक  दादागिरीही  निर्माण  झाली .

                                       याउलट  चिजामुळे  भुईसपाट  झालेल्या  नाडला  गेलेला  एक  दुसरा  चिन्हदलित  वर्गही  निर्माण  झाला  म्हणजे  मॉलमुळे  ज्या छोट्या  दुकानदारांची  दुकानदारे  भुईसपाट  होतायत  ते  दुकानदार  चिन्हदलितच  म्हटले  पाहिजेत  औदिगिकीकरणानेही  अनेक  पारंपरिक  उद्योगधंदे  असेच  नष्ट  केले  होते . म्हणजे  कापडगिरण्यांमुळे  हातांनी  कापड  बनवणारा  विणकरांचा   एक  मोठा  वर्ग  नष्ट  झाला  त्याचप्रमाणे  मल्टिनॅशनल  कंपन्यांमुळे  अनेक   छोट्यामोठ्या  उद्योगातील  कामगार  बेकार  झाले  ज्याच्यावर  चीजाचे  दुष्परिणाम  झाले  असा  हा  वर्ग  साधारण  ३०%  आहे  .  मी  ज्या  NNP  त  राहतो  तेथील  ८०% वस्ती  ही  ह्या  वर्गाची  आहे  आणि  त्यांच्या  कुटुंबाची  झालेली  वाताहत  मी  रोज  पाहतोय .

                                             भारतात  ३० %  ते  ४० %  लोकांचा  एक  वर्ग  असा  आहे  ज्याला  औद्योगिकीकरणाचाच  जर  फायदा  झाला   नव्हता  तर  चिजाचा  त्याच्यावर  काय  परिणाम  होणार  ?  चीजाचे  भवितव्य  हे  ह्या  वर्गावर  अवलंबून   आहे  चिजा  जर  ह्या  वर्गाला   फायदेशीर  ठरले  आणि  हा  वर्ग  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात   दाखल  झाला  तर  चिजा  ह्या देशांत  यशस्वी  होईल  अन्यथा  ते  कोसळून  पडेल .

                                                                   प्रतिसृष्टीय  विशीय  औद्योगिकीकरणात  मध्यमवर्ग  कुठल्या   वर्गाकडे जाणार  ह्यावर  भांडवलशाहीचे  भवितव्य  अवलंबून  असायचे  आज  नेमके  उलटे  झाले  आहे आज  हा  कोणाच्याच  अध्यात मध्यात   नसणारा  कंगाल  व  ज्याकाकडे  गमावण्यासाठी  काहीच  नाही  असा  जो  वर्ग  आहे  तो  कोणाकूडे  जातो  ह्यावर  ह्या  चीजाचे  भवितव्य  अवलंबून  आहे . 

तारीख : ७/८/१८

                                                                  चीजाने  हा  वर्ग  चीन , जपान ,अमेरिकेत  प्रयत्नपूर्वक  गिळंकृत  केला  आणि  त्याला  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्गात  आणले  भारतातही  हेच  घडले  तर  ती  एक  संघर्षहीन  क्रांती  असेल  हे  घडवण्यासाठी  लागणारी  संपर्कव्यवस्था  व  माध्यमक्रांती  चिजाकडे  आहे  हे  करण्यासाठी  मार्केट  ही  नैसर्गिक  गोष्ट  आहे  हे  पटवणारे   एक  तर्कशास्त्र  सध्या  उत्तरआधुनिकतेच्या  नावाखाली  विकसित   होत  आहे  हीच  उत्तरआधुनिकता  ब्लाईंड  सिडक्शनचे  व्हर्च्युअल  नमुने  आपल्या  पुढे  सादर  करीत  आहे  जे  बेहोश  आहेत  त्यांना  अधिक  बेहोश  करणे  आणि  जे  धड  नाहीत  ते  जागृतावस्थेत  येण्यापूर्वीच  त्यांना  सिड्यूस  करून  बेहोशीची  चटक  लावणे  (  लहान  मुले  ही  मुख्य  टारगेट  )  अशी  ही  सांस्कृतिक चिन्हशक्ती  आहे.  त्याचे  बरेवाईट  परिणाम  गेली  पंचवीस  वर्षे  आपण  अनुभवतोय .

                                                             चिजाने  त्या  जोरावरच  चिन्हसृष्टीय  मध्यमवर्ग  जो   सुरुवातीला   केवळ  ३  ते  ५ %  होता  तो  वाढवत  वाढवत  ३०  ते  ४० %  केला  आणि   येत्या  दहा  वर्षात  तो  ७० %  होऊन  ह्या  देशाचा  मुख्य  वर्ग  कसा  होईल  ह्याचा  विचार   चिजा  करते  आहे   त्या  दृष्टीने  मार्केट  तळागाळात  पोचवण्याचा  प्रयत्न  चालू  आहे  एकदा  का  तसे  झाले  कि  कम्युनिझमची  उरलीसुरली  धूळही  उडून  जाईल  त्यामुळेच  शोषणासंदर्भात  अधिक  सावधान  होण्याची  जबाबदारी  कलावंताच्यावर  येऊन  पडणार  आहे

                                                            चिजामुळे  आपण  आकुंचन  आणि  प्रसरण  ह्यामध्ये  डोलतो  आहे  The  world  is  shrinking  आणि  The  world  is  becoming  flat  ह्या  दोन्ही  प्रक्रिया  त्यामुळेच  घडताना  दिसतात  पूर्वी  भांडवल  श्रम  वगैरे  सर्व  गोष्टी  solid  होत्या  आता  सर्वच  गोष्टी  liquid  आणि  gaseous    अशा  वेळेला  तुमची  मुळे  धोक्यात  येणे  अटळ  कारण  मुळांचा  आधार  जमिनीची  solidity  असते  तीच  गेली  तर  काय  हा  प्रश्न  अटळ  !  liquidity  &  gaseousity   हा  चिजाचा  एक  मूलभूत  परिणाम

                                                          seduction   हे  नेहमीच  तुम्हाला  प्रथम  स्तंभित  करते  त्यासाठी  तुम्हाला  solidify   करते  तुम्ही  एक  प्रकारे स्तंभता !  ताठ  होता  !  १९८२ - ८७  हा  कालखंड  हा  स्तंभण्याचा   कालखंड  होता  तो  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  solid   अवस्थेचा  काळ  होता  त्यामुळेच  संजय  गांधीने  आणलेल्या  खाजगी  मोटार  मारुती  उद्योगाचे  काय  करायचे  ह्याविषयीचा  जो  गोंधळ  होता  तो  हळूहळू  ह्याच  काळात  सुटून  एकंदर  उदारीकरणाकडे  कल  वाढू  लागला  ह्या  काळात  संगणक  टीव्ही  वगैरे  गोष्टींनी  आपण स्तंभित  झालो  होतो  बाईक्सच्या  नवीन  मॉडेल्सनीही  हीच  अवस्था  केली  होती  ह्याच  काळात  सिमेंटचे  उदारीकरण  होऊन  बांधकामे  भरभराटली .

                                                           १९८८  नंतरचा  कालखंड  हा   ही  solidity  संपवण्याचा  काळ  होता  liquidity सुरु  झाली  सुखस्राव  दुःखस्राव  असे  सगळेच  स्त्राव  पाझरायला  लागले  मुख्य  म्हणजे टीव्ही  बाईक्स  वगैरेंमुळे  येणारा  अपराधभाव  गेला  व  त्याबाबत  अभिमान  पाझरायला  लागला जी  solidity  कसोशीने  सांभाळण्यात  आली  तिचे  विघटन  सुरु  झाले  कारण  सर्वत्र  liquidity  झिरपली  १९९५  नंतर  आपले  विमान  हवेत  गेलेय  ते  अद्याप  तरी  जमिनीवर  उतरलेले  नाही ही गॅसिअस  अवस्था  होय  गॅस  सर्वत्र  पसरतो  उधळतो  पाझरतो  नष्ट  करतो  सॉलिडिटीमध्ये  फ्रिक्शन  खूप  पण  त्या  फ्रिक्शनमुळे  मजाही  येते  लिक्विडिटीमध्ये  फ्रिक्शन  संपुष्ठात  येते. इथे  जो  मजा असतो  तो  वाहण्याचा आणि पाण्यात  पडून पोहण्याचा

तारीख :  ८/८/१८

                                                        गॅसिअसमध्ये   तुम्ही  टोटल फ्रिक्शनलेस  होता  इथे  तर  काठही  नाहीसे  होतात  सॉलिडिटीत  इंटरमिक्सींग  कमी  लिक्विडिटीमध्ये   प्रवाह  एकमेकांला  मिळायला  लागतात  आणि  गॅसिओसिटीमध्ये  कशात  काय  मिसळतंय  ते  कळणेही  मुश्किल  होऊन  जाते  ह्यातूनच  सांस्कृतिक  सरमिसळीचा   मुद्दा  ऐरणीवर  येतो  ह्या  सरमिसळीला  घाबरलेले  लोक  मूलतत्ववादाकडे   वळतात  दहशतवाद  हा  प्रतिकाराचा  आत्यंतिक  मार्ग  आहे  तो  आधुनिकही  असू  शकतो  पण  मूलतत्त्ववाद  हा  प्रतिकार  नसतो  तर  घाबरून  स्वतःच्या  सॉलिड  कोषात  सॉलिड  पायात  परतणे  असते  मूलतत्त्ववादी  दहशतवाद  हा  मार्ग  म्हणून  वापरू  शकतो  तर  दहशतवाद  मूलतत्त्ववादाला  साधन  म्हणून  वापरू  शकतो  ह्या  दोघांची  युक्ती  ही  १९८०  नंतरचा  एक  अजोबोगरीब  बदल  आहे  पंजाब  आसाम  काश्मीर  श्रीलंका   पॅलेस्टाईन  असे  अनेक  प्रश्न  त्याचा  परिणाम  आहेत.

                                                         liquid  अवस्थेत  भांडवलही  liquid  झाले  आणि  liquid   capitalism   जन्माला  आला  लवकरच  हा  capitalism  गॅसिअस  होईल  आतापर्यंतचा  जो  कॅपिटॅलिझम  होता  तो  solid  capitalism  होता  पण  चिन्हसृष्टीकरणामुळे  तो  liquid  झाला  हीच  गोष्ट  socialism   ची  आहे  आतापर्यंतचा  solid  socialism  होता  जगात  चिनचा  अपवाद  वगळता  तो  सर्वत्र  solid  राहिला चीनने  मात्र  चिन्हसृष्टीकरण  स्वीकारून liquid  socialism  चा  एक   नवा  पर्याय  पुढे  आणला
liquid  socialism  मध्ये  भांडवलाची  liquidity सहज  स्वीकारली  जाते  gaseous  capitalism   व  socialism मध्ये  आता  फार  पुढची  पावले  टाकली  जाणार  हे  उघड  आहे  अशा  वेळेला  मार्क्स  व  आंबेडकरांचा  solid  socialism  कालबाह्य  होत  जाणे  अटळ  आहे

तारीख :  १०/८/१८

                                                                    अशा  वेळेला  state ( राज्य ) ही  संस्था  liquid  होणे  अटळ  आहे  पूर्वी  state  ह्या  शब्दाचा  अर्थच  मुळात  solid  state  होता  ह्यामुळेच  liquid  state  ही  संकल्पना  स्वीकारणे  आपणाला  अजूनही  शक्य  झालेले  नाही  त्यातूनच  solid  state  आणि  liquid  capitalism  ह्यांच्यात  सतत  संघर्ष  होताना  सध्या  दिसतोय  हे  सर्व  अमेरिकेमुळे  होतय  असाही  एक  गैरसमज  झालेला  दिसतोय  माझ्या  मते  अमेरिका  उद्या  पृथ्वीवरून  नाहीशी  झाली  तरी  हेच  होणार  आहे  कारण  प्रश्न  चिन्हसृष्टीकरणाचा  आहे  अमेरिका  ही  ह्या  चिन्हसृष्टीकरणाचे  फक्त  नेतृत्व  करतेय पण  हे  नेतृत्वही येत्या  पंचवीस  वर्षात  कोसळून  पडणार  आहे.  चीन  आणि  युरोपियन  समुदाय  हे  नेतृत्व  कास  उलथून  टाकता  येईल  ह्याचीच  वाट  पाहतायत.  डॉलरचे  महत्त्व  संपुष्टात  आणण्याचे  चाललेले  प्रयत्न  हा  ह्या  प्रयत्नांचा  केवळ  एक  भाग  आहे .  हे  सगळेच  बदल  साहित्यावरही  प्रभाव  टाकतायत .

                                                              औद्योगिकीकरणात  माणसाचे  रूपांतर  कमोडिटीत  करण्याचा  प्रयत्न  केला  गेला.  त्याला  शह  म्हणून  modern  art  जन्माला  आली  अस्तित्ववाद  बोकाळला .  माणसाला  कमोडिटी  बनवण्यापासून  वाचवणे  व  त्याला  व्यक्तिमत्त्व  बहाल   करणे  हा या ह्या  चळवळीचा  पाया  ही  कला  subjective  झाली  कारण  subject  च  धोक्यात  आला  चिन्हसृष्टीकरणाने  माणसाचे  रूपांतर  सेमिओडीटीत  करण्याचा  प्रयत्न  चालवलेला  आहे  सेमिओडिटी  ही  एकाच  वेळी  कमोडिटी  असते  आणि  प्रोग्रामही  असते.  हा  प्रोग्राम  प्रीप्लान्ड  असतो  आणि  तरीही  त्यात  विविध  पर्यायांची  प्रचंड  गजबज  असते  जी  माणसाला  स्वातंत्र्याचा  आणि  मौजेचा  ठोस  आभास  देते  अशा  वेळी   कलावंताला  फक्त  कमोडिटीपासून  वाचून  किंवा  स्वतःचे  व्यक्तिमत्त्व  शाबूत  ठेऊन  चालत  नाही  तर  स्वतःला  ह्या  प्रीप्लान्ड  प्रोग्रामपासून  वाचवणेही  गरजेचे  बनते  चौथ्या  नवतेची  कविता  हे  काम  करते  आता  तिने  अधिक  पुढे  जाणे  आवश्यक  आहे  औद्योगिकीकरणाच्या  काळात  modern  art  ला  हळूहळू  कळून  चुकलं  की  असं  नुसतं  अस्तित्ववादी  व्यक्तिनिष्ठ  असून  भागणार  नाही  आणि  मग  collective  consciousness  ला  महत्व  देणारी  पर्यायी  modern  art  जगभर  पुढे  आली  आणि  तिने  postmodern  ला  जन्म  दिला  चीजाच्या  बाबतीत  कळत  नकळत  आता  आपली  हीच  अवस्था  होईल  मात्र  आपला  collective  consciousness  हा  modern  असून  चालणार  नाही  तर  तो  पूर्णपणे  नवा  व  चिन्हसृष्टीकरणाला  नीट  सामोरा  जाणारा  हवा  सध्या  काही  back  to  modern  ideology  चा  उथळ उद्योग  करतायत.  हे  म्हणजे  औद्योगिकीकरणाच्या  काळातील  प्रश्न  सोडवण्यासाठी  काही  लोक  संतांच्याकडे  जायचे  तसाच  काहीसा  हा   प्रकार  आहे  आसपासचे  बदल  नीट  न  कळल्याचे  हे  लक्षण  आहे  मुळात  ह्या  लोकांची  ideology  ही   ideology  राहिलेली  नाही  ती  श्रद्धा   बनलीये  आणि  एखादी  गोष्ट  श्रद्धा  बनली  कि  तुम्ही  तिच्या  विषयी  संशय  घेणे  हे  पाप  मानले  जाते  हे  पाप  मी  वारंवार  केल्याने  अनेकांची  पंचायत  झालेली  दिसते  पण  मी  माणूसच  असा  आहे  की  जो  बदलाला  नेहमीच  तयार  असतो

३.  तू  तुझ्या  कवितेत  तुझं  बदललेलं  जग  कशा  प्रकारे  आणलंय  ?  ते  आलंय  का  ?  कवितेत  नव्या  वस्तूंची  साधनांची, कॉम्प्युटरच्या / वेबवर्ल्डसंबंधी  गोष्टींची  नाव /  उल्लेख  करून  लिहिलेल्या  अनेक  कविता  हल्ली  वाचायला  मिळतात  अशा  कवितांबद्दल  तुला  काय  वाटतं ?  ह्याच  वस्तूंची /  गोष्टींची  नाव / उल्लेख  करून  लिहिलेली  एखादी  चांगली  कविता  आठवतेय  का  ?

                                               मी  एका  अर्थाने  चिन्हसृष्टीकरणाचा  अखंड  कवी  आहे .  माझ्या  स्वतःच्या  आयुष्यात  १९८२  ते  १९८७  हा  कालखंड  प्रचंड  सृजनाचा  कालखंड  आहे     

तारीख  :  ११/८/१८

                                                                    ह्या  काळात  मी  साधारण  हजार  बाराशे  कविता ,  तीस  कथा  , चार  एकांकिका , एक फसलेली   कादंबरी , नऊ  नाटके  एवढे  प्रचंड  लिखाण  केले  आहे. पूर्वी   मी  हा  एकदा  सांगितला  की  लोकांचा  विश्वास  बसायचा  नाही .  पण  डेकॅथलॉन  हा  संग्रह  बाहेर  पडल्यापासून  लोक  तितकासा  अविश्वास  दाखवत  नाहीत.  आता  डेकॅथलॉन  प्लस, डेकॅथलॉन मॅक्झिमम ,  तू ,  कोल्हापूर  ते  मुंबई  व्हाया  कविता  (  ह्यांचा  समावेश  कदाचित  पॉप्युलरतर्फे येऊ  घातलेल्या एका  भारतीय  विद्यार्थ्यांचे  उद्गार ह्या  संग्रहाच्या  आगामी  दुसऱ्या  आवृत्तीत  होईल  ) कोलाज ,  आऊट  ऑफ  थिंग असे  कविता  संग्रह  बाहेर  आले  की  हा  कालखंड  स्पष्ट होईल 

                                                                   १९८८  ते  १९९५  ह्या  कालखंडात  हे  प्रमाण  मंदावले .  प्रामुख्याने  ह्या  कालखंडात  लिहिल्या  गेलेल्या  कवितांचे  जास्त  प्रमाण  असणारा  क. व्ही. हा   संग्रह  आता  बाहेर  आलाय  माझ्या  दृष्टीने  ज्यांना  मी  चिन्हसृष्टीय  कविता  म्हणतो  अशा  सातशे  साडेसातशे  कविता  मी  लिहिल्या  त्या  १९८८  ते  २००३  ह्या  काळात.  त्यातील  चारशे  कविता  १९८८  ते  १९९५  ह्या  काळातील  असाव्यात .  ह्याशिवाय  ह्या  काळात  मी  अफेअर  डॉट  कॉम  नावाची  माझ्या  दृष्टीने  यशस्वी  कादंबरी  लिहिली .  तिचा  फायनल  ड्राफ्ट  मात्र  मला  तिचा  शेवट  न  आवडल्याने  अडून  होता .  तो  मी  नुकताच  केला.  ह्याशिवाय  सात  नाटके  वीस  कथा  सहा  सात  एकांकिका ,  टीकाहरण  मधील  बरीचशी समीक्षा  मी  ह्या  काळात  लिहिली  गेलीये .


                                                                   १९९६  पासून  मात्र  माझ्या  आयुष्यात  समीक्षा  नको  तितकी  महत्वाची  झाली . १९९६  ते  २००३  ह्या  काळात  मी  फक्त  साडेतीनशे  कविता  लिहिल्यात .  त्याचे  प्रतिनिधित्व  स्त्रीवाहिनी  ह्या  संग्रहात  आहे. मी  काहीसा  झपाटल्यासारखा  कविता  लिहितो .  एकाच  झपाट्यात  मी  दीर्घ  कविताही  लिहिल्या  आहेत  ह्या  अर्थाने  मी  अघोरी  कवी  आहे . मला  स्वतःला  फारस  माग  वळून  पाहायला  आवडत  नाही .  त्यामुळे  केलेले  लिखाण  प्रकाशित  करण्याचाही  फारसा   उत्साह  मला  नसायचा,  किंबहुना  १९९५   पर्यंत  ह्या  बाबतीत  मी  निरुत्साही  होतो . ह्याला  कारण  माझा  कोल्हापुरातला  कडवट  अनुभव  असावा माझ्या  लेखनाची  प्रचंड  अवहेलना  आणि  मानखंडना  झाल्याने  पुढे पुढे  मी  ते  दाखवायचेच  बंद  केले.

                                                                 माझ्या  प्रचंड  लेखनशक्तीमुळे  असेल, पण  माझ्या  आसपासचा  जवळ जवळ  प्रत्येक  बदल  माझ्या  कवितेत  कुठे  ना  कुठे  आलेला  आहे . चिन्हसृष्टीकरणाचे  तिन्ही  कालखंड   अनुक्रमे  ' डेकॅथलान ' , क.व्ही . आणि  स्त्रीवाहिनी  ह्या  कविता  संग्रहात  आलेले  दिसतील . क. व्ही त  जागतिकीकरण  हे  बाहेर  जास्त  आहे . स्त्रीवाहिनीत  हे  जागतिकीकरण  थेट  घरदारात  घुसलेले  दिसेल. आता  हे  मी  जाणीवपूर्वक  केलय  का ?  तर  जिथे  मला  ideology  चाच  प्रतिकार  करायचा  होता  तिथे  ते  जाणीवपूर्वक  आलय  पण  जवळजवळ  ९०% कवितेत  ते  अजाणताच  आलंय .

                                                               हे  मी  कशाप्रकारे  आणलंय  असं  म्हणशील  तर  सगळ्या  प्रकारे !
मी  कवितेला  आणि  आयुष्याला  चहुअंगांनी  भिडणारा  माणूस  आहे  कविता  ही  कुठल्यातरी  अमुक  एका  पद्धतीने  लिहिता  येते  ह्यावर  माझा  विश्वास  नाही.  डेकॅथलानच्या  पहिल्या   अर्ध्या   भागात मी  रोमँटिक  आहे  तर  नंतर  देशीवादी  व  दलित  साहित्याच्या  प्रभावाखाली  होतो .कोलाजमध्ये  तर  मी  कट्टरला  कट्टर  देशीवादी  होतो  इतका  की  हा  संग्रह  भालचंद्र  नेमाड्यांना मी  अर्पण  करावा  डेकॅथलॉन   प्लसमध्ये  मी  अस्तित्ववादी  होतो  तर  डेकॅथलान  मॅक्झिमममध्ये  पर्यायी  आधुनिकवादी  ज्याला  म्हणतात  तसा.  ह्या  काळात  मी  दर  चार  महिन्यांनी  काहीतरी  नवाच  असायचो . 


                                                               सप्टेंबर  १९८७  नंतर  मी  ह्या  साऱ्यातूनच  बाहेर  पडलो  आणि  चिन्हसृष्टवादी  झालो . १९८८  ला  मी  मुंबईत  राहता  येईल  का  ह्याची  चाचपणी  केली  आणि  १९८९   मध्ये राहायलाच  आलो.  माझ्यातला  हा  बदल  माझ्या  कोल्हापूरच्या  अनेक  मित्रांना  आजही  आवडत  नाही . त्यांच्या  मते   माझ्या  चांगल्या  कविता  ह्या  ८७  पर्यंतच  लिहिल्या  गेल्या  पण  मित्रांच्या  पेक्षा  आपला  आतला  आवाज  काय  म्हणतो हे  महत्वाचे  वाटल्याने  मी  नवे  बदल   आत्मसात  करत  राहिलो. 

                                                             आता  पुढचा  प्रश्न  तर  प्रत्येक  काळात  प्रतिभा  नसलेले  काही  चलाख  लोक  असतातच  हे  चलाख  लोक असतातच . हे  चलाख  लोक कम्प्युटर  वगैरे  उल्लेख  करून  कविता  लिहिणारच .  आपण  कि  त्यांच्याकडे  लक्ष  द्यायचे  कारण  नाही,  पण  त्याच  बरोबर  प्रचंड  थोर  वगैरे  असंही  कुणी  समजू  नये . ते  एक  मशीन  आहे. ह्याचे  भान  बाळगावे.  जाहिरातीच्या  क्षेत्रातली  मशीन्स  ही तुमच्या  p.c. पेक्षा  शंभर  पटींनी  श्रेष्ठ  असतात .

                                                             तेव्हा  p.c.  आला   म्हणजे  सगळं  आलं  असं  समजण हेही  तितकंच  वाईट .  हल्ली  काही  मध्यमवर्गीय  कवींना  आपण  पी.सी  वापरतो  ह्याचाच  माज  आलाय , म्हणून   हे  सांगावेसे  वाटते .  तुमचे स्टेट्स  सिम्बॉल हे  कवितेत  फारसे  कामाचे  नसते . पाब्लो  नेरुदाने  मी  टाईपरायटरने  मुद्दाम  जाणीवपूर्वक  कविता  लिहीत  नाही , कारण त्याने  मानवी  स्पर्श नाहीसा  होतो असे  म्हंटले  होते,  तर  पी.सी  न  वापरणे  हीही  एखाद्या  कवीची  फार  जाणीवपूर्वक  केलेली  निवड  असू  शकते .

                                                            कवितेबाबत  एक  मूलभूत  गोष्ट  आपण  सर्वांनी  लक्षात  घ्यायला  हवी.  प्रत्येक  अनुभव  नवा  असतो प्रत्येक  क्षण  नवा  असतो ,  प्रत्येक  क्षणी  अवकाश  नवा  असतो त्यामुळे  प्रत्येक  कविता  ही  नवी  असते. जोपर्यंत  कागदावर  काय  उमटणार  ह्याविषयीचे  थ्रिल  जिवंत  असते  तोपर्यत  तुम्ही  कवी  असता  ज्यादिवशी  हे  थ्रिल संपते  लिखाणात  प्रेडिक्टबिलिटी  येते, तुमचा  जुनाट  मेंदूच  स्मरणशक्तीद्वारे  तुमची  कविता  लिहायला  लागतो त्या  दिवशी  तुम्ही  कवी  म्हणून  संपलेले  असता.


४ . तुझ्या  जगण्याचा  कवितेवर  व  कवितेचा  जगण्यावर  परिणाम  होतोय  का ? कशा  रीतीने  ? तुझ्या  दृष्टीने  तुझ्या  कवितेचं  जग  कोणतं  ?  उदाहरणार्थ ? तुझ्या  दृष्टीने  तुला  कवी  म्हणून ,  माणूस म्हणून, मराठी  भाषक म्हणून, भारतीय  म्हणून, जागतिक  ग्लोबल  नागरिक  म्हणून  कुठल्या  समस्या  आहेत ? त्या  समस्यांचा  सामना  कसा  करावा ? काय  काय  उपाय  या  समस्यांवर  असू  शकतात ? नसल्यास  का  नाहीत ? असल्यास  भविष्यात  काय  करावं ?  तू  लिहितोय  म्हणजे  नेमकं काय  करतोय ? तुला  कविता  लिहायची  ऊर्जा कुठून  मिळते  ? 

                                                              मी  कवितेने  आतून  बाहेरून  झपाटलेला  मनुष्य  आहे . माझ्यात  एक  लहान  मूल  आहे  ज्याला  ह्या  जगातल्या  प्रत्येक  गोष्टीविषयी  कुतूहल  आहे  आणि   माझ्यात  एक  तत्वज्ञ  आहे ज्याला  जे  जे  आपल्याला  कळलंय  ते  ते  सगळं  सांगायचंय . मला  वाटते , कविता  ही जगातली  कदाचित  एकमेव  गोष्ट  असेल  जिथे  हे  लहान  मूल  आणि  तत्वज्ञ  एकत्र  नांदू  शकतात . कविता  ही त्यामुळेच  अनेकदा   लहान  मुलाने  सांगितलेले  तत्वज्ञान  असते  किंवा  तत्वज्ञांचे  बालसुलभ  कुतूहल  व  त्यापोटी  त्याने  घेतलेला  शोध असते . कविता  ही  जीवनाचे  असे  एक  इंटरनेट  आहे  जिथे  माझ्या आयुष्यातल्या  सगळ्याच  वेबसाईट्स  एकत्र   येऊन  मिळतात . सॉलिड, लिक्विड , गॅसिअसचे  प्रेशिअस  इंटरनेट !  मी  एक  असा  मनुष्य  आहे  जो  असंख्य  तुकड्यात  विखरून  पडलाय ,  आणि  तरीही  जो हे  सगळे  तुकडे  कासवांसारखे  कवितेच्या  पोटात  घेऊन  आरामात  चाललाय .

                                                               माझे  स्वतःचे  जगणे  गाव, शहर आणि  महानगर अशा  तिन्ही  अवकाशात  फिरत  असल्याने  ह्या  तिन्ही  अवकाशांची  सरमिसळ  माझ्या  कवितेत  होत  असते. ह्यात   भरीसभर  म्हणून   माझ्यावर  फुले ,  आंबेडकरांचा ,  विशेषतः  गौतम  बुद्धांचा  दार्शनिक  पातळीवर  सखोल  ठसा  आहे  त्यामुळे  दलित  अवकाशविषयी  मी  नको  तितका  सजग  आहे  मी  जन्माने  दलित  नसूनही  माझे  आयुष्य  अनेक  हालअपेष्टांतून  गेल्याने  मला  दलित  साहित्य  जेवढे  आपले  वाटले  तेवढे  इतर  साहित्य  वाटले  नाही  आणि  हे  सर्व  कमी  म्हणू  की  काय ,  माझ्या  घरात  आसपास  फक्त  स्त्रिया .  माझ्या  आईकडे  तर  मुलगाच  नाही  सगळ्या  बहिणीच  आणि  मी  ज्या  पाटलांच्या  घरी  जन्मलो  तिथेही  बायकाच . त्यात  पुन्हा  भर  म्हणजे  लहानपणी  माझ्या  सावळ्याकाळ्या  रंगात  निळसर  झाक  होती  ( जी  पुढे  नाहीशी  झाली  ) .

                                                                मग  काय होणार ? माझा  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  पार   श्रीकृष्ण  केला  जणू  ह्या  बायका  लाड  करण्यासाठी  एका  पुरुषाची  वाटच  पाहात  होत्या  आणि  मी  जन्मलो !  त्यामुळे  स्त्रैण  अवकाश  हा  मला  लहानपणापासुन  नको  तितका  उपलब्ध  झालाय . ह्या  सगळ्या  बायकांनी  त्यांच्या  दृष्टीने  मी  आदर्श  पुरुष  व्हावे  म्हणून  यथेच्छ  धडपड  केली .  त्यामुळे  कुस्तीपासून  फुटबॉलपर्यंत  ज्याला  ज्याला  पुरुषी  टॅग्ज  लागला त्या  त्या  गोष्टी  मला  करायला  लागल्या  ह्या  सगळ्याच  गाववाल्या !  स्त्रीमुक्तीचे  वारे  तितकेसे  न पोचलेले !   त्यामुळे  त्यांनी  मला  व्यवस्थित  पुरुष  बनवला . माझा  स्त्रीवाहिनी  हा  संग्रह  ही  ह्या  बायकांची  देन . त्यांच्यामुळेच  मी  महानगरातल्या  स्त्रिया  नीट  जोखू  शकलो . अनेकांना  वाटतं   तसा  काही  तो  स्त्रियांच्या  नजरेतून  लिहिलेला  संग्रह  नाही .  तर  माझ्यातच  असलेल्या  आणि  माझ्या  आसपासच्या  बायकांनी  जागे  केलेल्या  माझ्यातल्या  स्त्रीने  लिहिलेला  तो  संग्रह  आहे .    

                                                             मी  लोकांशी  कमिटमेन्ट  असणारा  एक   कवी  आहे . त्यामुळेच  मी  कुठल्याही  संघटनेच्या  चरणाशी   निष्ठा  वाहिल्या  नाहीत  आणि  ज्या  संघटना  मी  जॉईन  केल्या  तिथे  मी  प्रमुखच  होतो .